महापालिका निवडणुकीत मतं खेचण्यासाठी राजकीय रस्सीखेच, गणेशोत्सवानिमित्त मोफत प्रवास सुविधा

मुंबई : मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या नावांची यादी बनवणे, बसगाडीत चढण्या-उतरण्याचे ठिकाण निश्चित करणे, एकाच वाडीतील अनेक प्रवासी असल्यास थेट वाडीत गाडी नेण्याची व्यवस्था, बसप्रमुख निश्चित करणे…अशी तयारी मुंबई, ठाणे, डोंबिवलीतील राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये वेगाने सुरू आहे.
यंदा गणेशोत्सवाच्या ‘गुलाला’त आगामी महापालिका निवडणुकांचा ‘रंग’ असणार आहे. त्यामुळे उत्सवी प्रवासात कोकणवासीयांची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. भाजपने ५०० बसगाड्या आरक्षित करत आघाडी घेतली. शिवसेनेकडून खासगी बसगाड्या आरक्षित करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
यंदा २७ ऑगस्टला गणपतींचे आगमन होणार आहे. त्याआधीचा शनिवार-रविवार हा कोकणवासीयांचा प्रवासवार ठरणार आहे. प्रवासी अर्थात मतदारांच्या कलानुसार २३ ते २५ ऑगस्टदरम्यान मुंबई आणि परिसरातील चाकरमानी कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षही याच मुहूर्तावर गाड्या चालवण्याचे नियोजन करीत आहेत. नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले असून, विशेष गाड्यांचे आरक्षण लवकरच सुरू होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्सव विशेष एसटी गाड्या कमी आहेत. निवडणुकांच्या धर्तीवर मतदारांना ‘शहर ते कोकण ते शहर’ असा प्रवास घडवून आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने प्रयत्न सुरू केले आहेत.
मुंबईतील भाजपच्या कोकण विकास आघाडीच्या संपूर्ण चमूकडून कोकणासाठीच्या गाड्या चालवण्याचे नियोजन केले जाते. प्रत्येक वॉर्डमधून बससाठीचे आरक्षण घेण्यात येते. वॉर्ड, मंडळ, जिल्हा अशा पद्धतीने अंतिम प्रवाशांची यादी तयार केली जाते. त्यानुसार गाड्या कोकणासाठी चालवण्यात येणार आहेत.
२४ जुलैपासून आरक्षण
उत्सवानिमित्त मध्य रेल्वेने २५० विशेष रेल्वेफेऱ्यांची घोषणा केली असून याचे आरक्षण गुरुवार, २४ जुलैपासून सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेने ४४ विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणी केली असून याचे आरक्षण बुधवार, २३ जुलैपासून सुरू होणार आहे. एसटी महामंडळाने ५,००० गाड्यांची घोषणा केली असून याचे आरक्षण सुरू झाले आहे.
अधिकाधिक गाड्यांचे लक्ष्य
बोरिवली, भांडुप, जोगेश्वरी, गोरेगाव, विक्रोळी, घाटकोपर, दादर, विलेपार्ले अशा भागांतून कोकणात गाड्या धावणार आहेत. ठाणे, डोंबिवली पट्ट्यातूनही प्रवाशांसाठी बस चालवण्याचे नियोजन आहे. एसटी महामंडळातील सेमी लक्झरी (एशियाड), आरामदायी, वातानुकूलित अशा सर्व प्रकारच्या बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी ५१२ बसगाड्या आणि चार रेल्वेगाड्या चालवण्यात आल्या होत्या. यंदाही अधिक गाड्या चालवण्यात येणार आहेत, असे भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.



