‘६ महिन्यात असं कसं घडलं?’; उद्धव ठाकरेंनी केला लोकसभा-विधानसभा निकालावर ‘तू तू मै मै’ खुलासा

केंद्रीय निवडणूक आयोगावर ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हल्लाबोल केला. सामनाच्या महामुलाखतीत उद्धव ठाकरेंनी आयोगावर टीका केलीय. निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना नाव, चिन्हं इतरांना देण्याचा धोंड्याला अधिकार नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली. तसंच देश अशांत, अस्थिर ठेवायचा हेच भाजपचं धोरण आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 75 वर्षे भरत असल्याचा इशारा सरसंघचालकांनी दिलाय, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये लोकसभेचा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर देखील भाष्य केलं आहे. जे तुम्ही लोकसभेला कमावलंत, ते विधानसभेला गमावलंत. फक्त सहा महिन्यांत हे कसं घडलं?, असा प्रश्न संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारला. यावर विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. ‘तू तू मैं मैं’ झालं. त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडीत खेचाखेची झाली- उद्धव ठाकरे
सगळ्या गोष्टींत हात वर करण्यात अर्थ नाही. काही गोष्टी जबाबदारीने स्वीकारल्या पाहिजेत. ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी, बोगस मतदार या सगळयांवर आता चर्चा सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले. मतदार कसे वाढले हे लोकांसमोर आलंय. ‘लाडकी बहीण’सारख्या आता फसव्या ठरलेल्या योजना याचा परिणाम झाला. निवडणूक मोठी असली की, वाद थोडे कमी असतात. निवडणुकीचा मतदारसंघ छोटा झाला की, स्पर्धा वाढत जाते. लोकसभेच्यावेळी महाविकास आघाडीत खेचाखेची झाली. आम्ही त्या वेळी चार-चार, पाच-पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ ‘आपल्याला जिंकायचंय’ म्हणून सोडून दिले, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
लोकसभेचे यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेलं- उद्धव ठाकरे
विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली ‘तू तू मैं मैं’ झालं. त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला. लोकसभेला प्रचार करताना चिन्ह नसलं तरी उमेदवार होते, विधानसभेला चिन्ह होतं, पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानापुर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हतं. ही चूक होती. ती पुढे सुधारली पाहिजे. ती चूक पुन्हा करायची असेल तर एकत्र येण्याला अर्थ राहत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर समन्वयाचा अभाव होता?, असं संजय राऊतांनी विचारले. यानंतर समन्वयाच्या अभावापेक्षाही लोकसभेचे यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेलं होतं, असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं. लोकसभेच्या वेळी आपल्याला जिंकायचं आहे हे आपलेपण होतं, विधानसभेला मला जिंकायचंय हा आपल्यात जो ‘भी’पणा आला तेव्हा पराभव आला. त्यात शेतकरी कर्जमाफी वगैरे तांत्रिक बाबी होत्या, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.



