इंडिया आघाडीत फूट, विधानसभेला महाराष्ट्रात जोरदार प्रचार; आता काँग्रेसवर जोरदार टीका करत पक्ष पडला बाहेर

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने शुक्रवारी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीशी काडीमोड घेतला. पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय सिंह यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या वेळी आम आदमी पक्षाने महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार केला होता, मात्र आता आपच्या निर्णयाने इंडिया आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील आगामी निवडणुकांवर काय पडसाद उमटणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
‘राजकारण हा पोरासोरांचा खेळ नाही’, असे सांगत काँग्रेस नेतृत्वावरही ‘आप’चे खासदार सिंह यांनी सडकून टीका केली व ‘ससंदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, आज, शनिवारी होणाऱ्या ‘इंडिया’तील घटक पक्षांच्या बैठकीला पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित नसतील’, असे सिंह यांनी सांगितले.
काय म्हणाले संजय सिंह?
“इंडिया’ची स्थापना फक्त 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आली होती. पक्षाने त्यानंतरच्या सर्व विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या आहेत. ‘आप’ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही पंजाब, गुजरात, दिल्ली आणि हरियाणा विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवल्या व आगामी बिहार निवडणुकाही स्वबळावर लढू. आपला पक्ष संसदेत विरोधी पक्षांशी धोरणात्मक युती करेल’, असे सिंह यांनी स्पष्ट केले.
‘संसदीय मुद्द्यांवर आम्ही तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकसारख्या विरोधी पक्षांचा पाठिंबा घेतो आणि ते आमचाही पाठिंबा घेतात’, असे सांगत, विरोधी गटाचे नेतृत्व करण्यात काँग्रेसच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेतृत्वाने ‘इंडिया’च्या बैठका घेतल्या का? ‘इंडिया’चा विस्तार करण्यासाठी काही पुढाकार घेतला का? त्यांचे नेते कधी अखिलेश यादव, कधी उद्धव ठाकरे आणि कधी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत रहातात.
काँग्रेस हा आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष आहे. पण विरोधी पक्षांच्या एकीसाठी त्यांनी काही भूमिका बजावली का’, असे प्रश्नही यावेळी संजय सिंह यांनी उपस्थित केले.



