मुंबईसह उपनगरात मुसळधार, घाटमाथ्यावर यलो अलर्ट; कसा असेल पावसाचा अंदाज?

पुणे : मागील जवळपास आठवडाभर राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप घेतली होती. गेले काही दिवस पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरला होता. त्यानंतर आता आठवड्याच्या सुरुवातील काल सोमवारी पावसाने मुंबईसह उपनगरात आणि राज्यातील विविध भागात जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याकडून २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत साधारणपणे ढगाळ आकाश आणि अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. शिवाय अधूनमधून जोरदार वारे वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली होती. या अंदाजानुसारच सोमवारी दिवसभर जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होता.
समुद्रावर कमी दाबाचा पट्टा
कमी दाबाचे क्षेत्र वायव्य मध्यप्रदेश आणि पूर्व भागात आहे. पुढील २ दिवसांत राजस्थानमधून हळूहळू पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. दुसरे कमी दाबाचे क्षेत्र आता दक्षिण-पश्चिम बांगलादेश आणि पूर्व-पश्चिम भूमध्य समुद्रावर आहे. पुढील २४ तासांत वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह उत्तर कोकणात मध्यम प्रमाणात वारे वाहू शकतात.
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस
दरम्यान, तरी नाशिक शहरात सोमवारी दुपारी पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. अवघ्या दोन तासांमध्ये ३१.२ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडवली.
नाशिकसह घाटमाथ्यावर यलो अलर्ट
ग्रामीण भागातही काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिक शहरात गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. परंतु, त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होत गेला. सोमवारी (दि. १४) हवामान विभागाने नाशिकसह घाटमाथ्यावर पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणीच – पाणी
दुपारी दीडनंतर शहरावर ढग दाटून आले. काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल दोन तास पावसाच्या मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. या दोन तासांमध्ये शहरात ३१.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अवघ्या काही मिनिटांतच शहरातील रस्त्यांवर पाणी-पाणी होऊन अनेक ठिकाणी तळी साचली. त्यामधून वाट शोधताना वाहनचालकांची धांदल उडाली.
दरम्यान, सकाळी साडे आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये २.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ३.२ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला, पेठमध्ये १६.५, तर त्र्यंबकेश्वरमध्ये १६.४ मिलिमीटर पाऊस झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.



