नांदेड बाजार समितीत शेतकरी आक्रमक: हळदीचा लिलाव बंद पाडला, तात्काळ पैशांची मागणी!

नांदेड : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करत हळदीचा लिलाव बंद पाडला. हळद खरेदी केल्यानंतरही व्यापारी ९० दिवसांपर्यंत पैसे देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. खरेदीनंतर शेतकऱ्यांना तात्काळ पैसे मिळावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयात जाऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि सभापती संजय लहानकर यांना घेराव घातला. यावेळी त्यांनी सभापतींवर प्रश्नांचा भडीमार करत त्यांच्याकडून ठोस उत्तराची मागणी केली.
शेतकऱ्यांचा रोष पाहून सभापती संजय लहानकर यांनी सोमवारपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळतील असे आश्वासन दिले आहे. मात्र, जर बाजार समितीने आपल्या कामकाजात सुधारणा केली नाही, तर बेमुदत लिलाव बंद पाडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.



