रात्र निवारा मोहिमेस यश – पाच बेघर नागरिकांना मिळाला सुरक्षित निवारा

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या संयुक्त शोधमोहीमेद्वारे शहरातील पाच बेघर नागरिकांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यात आला. ही मोहिम राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) विभाग व अतिक्रमण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मा. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आली.
दिनांक १० जुलै रोजी रात्री ८:३० ते १२:०० या वेळेत मुख्य रस्ते, बस स्थानके, रेल्वे स्टेशन, मंदिर परिसर अशा ठिकाणी उघड्यावर झोपणाऱ्या नागरिकांचा शोध घेण्यात आला. मोहिमेदरम्यान एकूण ५ बेघर नागरिक आढळून आले. या सर्वांना तत्काळ ‘रात्र निवारा केंद्र – बडनेरा’ येथे हलविण्यात आले. संबंधित केंद्रात त्यांना अन्न, पाणी, वैद्यकीय सुविधा तसेच सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यात आला.
अमरावती महानगरपालिकेमार्फत अशा प्रकारच्या मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असून, कोणताही नागरिक उघड्यावर झोपू नये यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
शहरात बेघर स्थितीत राहणारे नागरिक आढळल्यास अथवा अशा व्यक्तींना मदतीची आवश्यकता वाटल्यास, नागरिकांनी तात्काळ महानगरपालिकेच्या NULM विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.



