
विदर्भात पावसाने जोर धरला असून नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आला आहे. हवामान विभागाने मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला असून काही जिल्ह्यांमध्ये रेड, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई : राज्यभरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मागील १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे. विदर्भात पावसाची तुरळक हजेरी होती. मात्र मागील दोन दिवसांपासून विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळित झालं आहे. दरम्यान, हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, कोकणात पावासाची शक्यता वर्तवली आहे. पुढील २ दिवसांत मध्य भारतातील काही भागांमध्ये आणि कोकण भागांसह पश्चिम किनारपट्टीवर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात कसा असेल पाऊस?
हवामान विभागाने मुंबईच्या मध्यवर्ती भागात तीव्र ते अतिशय तीव्र पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई उपनगर आणि नवी मुंबईच्या काही भागात वारे वाहू लागले. मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः आकाश ढगाळ राहणार असून अधूनमधून मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत कमाल २९°C आणि किमान २६°C आसपास तापमान असेल.
मुंबई आणि उपनगरात पावसाची नोंद
मुंबई आणि आसपासच्या भागात गेल्या ३ तासांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाला आहे. तर नवी मुंबईत ३ तासांत ६० ते ८० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला. मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील काही भागात, काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे.
कोणत्या जिल्ह्याला कोणता इशारा?
रेड अलर्ट – भंडारा, गोंदिया, नागपूर
ऑरेंज अलर्ट – अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली
यलो अलर्ट – अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ
काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह, वादळी वारे वाहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मध्यम ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.



