भातकुलीत दुबार पेरणीचं संकट: पावसाअभावी शेतकरी हवालदिल.

भातकुली : भातकुली तालुक्यात यंदा खरिप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांचे संकट अधिकच वाढले आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक भागात योग्यवेळी पेरणी झाली नाही. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर आणि कपाशीची पेरणी करून घेतली खरी, पण नंतर पावसाने दांडी मारल्याने पिकं उगवण्याआधीच वाळू लागली आहेत. परिणामी, दुबार पेरणीचे संकट उभं ठाकलं आहे.
वन्यप्राण्यांचा उपद्रव; रात्री गस्तीस सुरुवात
दुबार पेरणीचे ओझं सहन करत असतानाच, शेतकऱ्यांना आणखी एक संकट भेडसावत आहे—वन्यप्राण्यांचा हैदोस. पिकांचं संरक्षण करण्यासाठी अनेक शेतकरी रात्री मोबाईल टॉर्च आणि बॅटरी घेऊन स्वतः गस्त घालू लागले आहेत. रानडुकरं, नीलगायी आणि अन्य वन्य प्राणी शेतात घुसून उगवलेली पिकं खाऊ लागल्याने नुकसान वाढत आहे.
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वीजपुरवठा कोलमडला
दुसरीकडे, सिंचनासाठी आवश्यक असलेली वीजसुद्धा वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढली आहे. अनेक भागात विद्युत रोहित्र आणि लाईन बंद असून, महावितरणकडून दुरुस्तीचा वेग अत्यंत मंद आहे. काही शेतकऱ्यांकडे पिंकरसारखी सिंचन व्यवस्था असली तरी वीज नसल्याने त्याचा उपयोग होऊ शकत नाही.
पिकविमा मिळाला नाही; ‘कोरा सातबारा’ची मागणी
शेतकऱ्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत सांगितले की, मागील वर्षी जाहीर केलेला पिकविमा अजूनही मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी पूर्णपणे कोलमडली आहे. निसर्गाची लहर, वन्यप्राणी, वीजेचा अभाव आणि विमा मिळालेला नाही—या साऱ्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात अडकला आहे. त्यामुळे ‘सातबारा कोरा करून’ थेट मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.



