अश्विनीचा जीवलगाशी दुरावा अन् रोहितचं स्वत:चं टेंशन…मानलेल्या भावा-बहीणेने एकत्र आयुष्य संपवलं, चिठ्ठीत काय लिहिलं? सोलापूर घटनेनं हादरलं

सोलापूर : सोलापूर शहरातील कर्णिक नगरमध्ये गुरुवारी एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. 23 वर्षांच्या अश्विनी वीरेश केसापुरे आणि रोहित भिमू ठणकेदार या मानलेल्या भाऊ-बहिणीने एकाच वेळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपासात हळूहळू या घटनेमागील कारणे स्पष्ट होत आहेत. अश्विनी मागील काही वर्षांपासून एका तरुणासोबत प्रेमसंबंधात होती. मात्र, बॉयफ्रेंडने नातं तोडून दुसऱ्या मुलीकडे वळल्याने ती मानसिक तणावात गेली. तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये त्या मुलीबद्दल प्रचंड राग व्यक्त केला आहे. तिच्या चिठ्ठीत, “मी मेल्यावर तुला माझं खरं प्रेम समजेल. माझ्या कपाळावर कुंकू लावायला ये,” अशा भावनिक ओळी लिहलेल्या होत्या.
तू मेल्यानंतर मी कसं जगू?
रोहित ठणकेदार हा अविवाहित होता आणि अश्विनीला तो बहीण आणि आईसारखं मानायचा. “तू मेल्यानंतर मी कसं जगू?” अशी भावना त्याच्या मनात होती. अश्विनीचा भावनिक ओढ त्याच्यासाठी इतकी खोलवर होती की, शेवटी त्यानेही तिच्यासोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. अश्विनीने तिच्या सुसाईड नोटमध्ये कोणालाही दोषी ठरवू नये असे स्पष्ट लिहिले होते. त्यामुळे पोलिसांनी तिच्या बॉयफ्रेंडला क्लिनचिट दिली आहे. सध्या एमआयडीसी पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी त्यांच्या मित्रांचे जबाब नोंदवले आहेत.
जीवलगाबरोबरच्या मैत्रीत आलेला दुरावा अन्…
दोघांचाही मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात दोघांनी स्वतःहून गळफास घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. ही घटना केवळ आत्महत्येची नसून, एका तुटलेल्या नात्यामुळे निर्माण झालेल्या असहायतेचं भयावह चित्र आहे. जीवलगाबरोबरच्या मैत्रीत आलेला दुरावा आणि नंतर सर्व मित्रांनी तोडलेले संबंध यामुळे अश्विनीने तर थेट आत्महत्या करण्याचे ठरवले. रोहित हा कर्णिकनगरमधील एका घरामध्ये असताना अश्विनी तिथे आली. तिने आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी रोहितला आपल्या कुटुंबातील नातेसंबंधाबाबत काही ठाऊक नसलेली माहिती मिळाली होती. त्यामुळे तो आधीच तणावाखाली होता. त्यानंतर मित्रांनी संबंध तोडून दिल्याने तणाव आणखी वाढला होता. याचेवळी अश्विनीने आत्महत्या करण्याचे ठरविल्याने त्याने तिच्याबरोबरच एकाच स्कार्फला गळफास स्वतःला संपविलं.
माझ्या भांगेत कुंकू भर
आत्महत्येपूर्वी अश्विनीने लिहलेल्या चिठ्ठीत तू माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. तुझ्यावर माझा सगळ्यात जास्त जीव आहे. हे तू ओळखायला हवे होते, यामुळे मी गेल्यावर माझ्या भांगेत तू कुंकू भर असे अश्विनीनं चिठ्ठीत लिहून आत्महत्या केल्याची माहिती आहे.



