मेळघाटात अजूनही पाणीटंचाईचा सामना; महिलांना डोक्यावरून १ किमीवरून वाहून आणावे लागते पाणी!

मेळघाट : पावसाळ्याचा प्रारंभ झालेला असतानाही अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील मोथा गाव अजूनही भीषण पाणीटंचाईच्या विळख्यात आहे. “हर घर नल” योजनेचे स्वप्न अद्याप या गावात साकार झालेले नाही.
गावातील महिलांना आजही डोक्यावर हंडा घेऊन १ किमी अंतरावर असलेल्या विहिरीतून पाणी आणावं लागतं. पावसाचे आगमन असूनसुद्धा गावात नळयोजना कार्यान्वित झालेली नाही. परिणामी, घोटभर पाण्यासाठी महिलांना दररोजची फरपट सहन करावी लागत आहे.
कुचकामी पाणीपुरवठा योजना
मेळघाटसारख्या आदिवासीबहुल भागात केंद्र व राज्य शासनाने अनेक जलयुक्त शिवार व पाणीपुरवठा योजना जाहीर केल्या, मात्र वास्तविक अंमलबजावणी मात्र अपूर्ण राहिल्याचे यावरून दिसून येते. स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत व जलसंपदा विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
महिलांची मागणी – ‘हर घर नल’ योजनेची अंमलबजावणी करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “हर घर नल” योजनेअंतर्गत प्रत्येक घरात नळाने पाणी पोहोचवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र मोथा गावात ही योजना केवळ कागदावरच दिसते. महिलांनी तत्काळ योजनेच्या अंमलबजावणीची मागणी केली आहे.
प्रशासनाकडे बोट
गावातील नागरीकांनी स्थानिक जलसंपदा अधिकारी व पंचायत समितीकडे तक्रारी केल्या असल्या, तरी यावर ठोस कारवाई झालेली नाही. गावकऱ्यांच्या मते, योजनेसाठी निधी आला असला तरी अंमलबजावणीत भ्रष्टाचारामुळे काम रखडले आहे.



