‘जिवंत सातबारा’ मोहिमेला अमरावती विभागात भरघोस यश!

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराचे राज्यभरात कौतुक; हजारो वारसांना मिळाला न्याय
अमरावती : राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हाती घेतलेल्या ‘जिवंत सातबारा’ मोहिमेने अमरावती विभागात मोठे यश मिळवले आहे. मृत खातेदारांच्या जमिनींवरील वारसांची नोंद वेळेत न झाल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही मोहीम आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरत आहे.
56 तालुक्यांतील 32 हजार मृत खातेदार ओळखले
अमरावती विभागातील 56 तालुक्यांमध्ये 32,195 मृत खातेदार आढळून आले. यामध्ये 20,502 वारसांनी फेरफारासाठी अर्ज दाखल केला असून, यापैकी 20,301 प्रकरणांवर निर्णय घेण्यात आला आहे. त्यात 19,150 फेरफार मंजूर झाले असून, केवळ 143 अर्ज नामंजूर झाले आहेत. ही आकडेवारी मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीची साक्ष देत आहे.
‘100 दिवस कृती आराखडा’ अंतर्गत प्रभावी अंमलबजावणी
या मोहिमेची अंमलबजावणी ‘100 दिवस कृती आराखडा’ उपक्रमाअंतर्गत करण्यात आली. गावपातळीवर मृत खातेदारांच्या सातबारा उताऱ्यांमध्ये वारसांची नोंद पूर्ण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमामुळे शेतीचे वारस हक्क, कर्ज प्रक्रिया, विक्री व्यवहार आणि सरकारी योजनांच्या लाभांमध्ये अडथळा येणे टळले आहे.
सामान्य शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त
या उपक्रमामुळे हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मालकीहक्काबाबत स्पष्टता आणि कायदेशीर अधिकृतता मिळाली आहे. त्यामुळे नियमित शेती व्यवहार, बँक कर्जप्रक्रिया आणि सरकारी योजना लाभ घेणे अधिक सुलभ झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पालकमंत्री बावनकुळे यांचे आभार मानले आहेत.



