बच्चू कडूंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ भीम ब्रिगेडचे चक्काजाम आंदोलन
अमरावती : शेतकरी, अपंग, निराधार नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी ८ जूनपासून सुरू केलेल्या आमरण उपोषणाला राज्यभरातून जोरदार पाठिंबा मिळू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवार, १४ जून रोजी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्याजवळ भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
- आंदोलनाचे ठळक वैशिष्ट्ये :
राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प - रस्त्यावर सोयाबीन, तूर, ज्वारी फेकून सरकारचा निषेध
- बच्चू कडू यांच्या पोस्टरवर दूध अभिषेक करून जाहीर पाठिंबा
“महायुती सरकार हाय हाय”, “शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा आमचा सुरूच राहील” अशा घोषणांनी परिसर दणाणला
भीम ब्रिगेडचा इशारा :
भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे यांनी आंदोलनादरम्यान स्पष्ट इशारा दिला की,
“जर लवकरात लवकर बच्चू कडू यांच्या आणि प्रहार संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर याहून अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारलं जाईल. हा लढा सामान्य माणसाच्या हक्कासाठी आहे!”
वाहतूक व्यवस्थेवर परिणाम :
चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. पोलिसांनी मध्यस्थी करत मार्ग मोकळा केला, मात्र आंदोलनकर्त्यांच्या संतप्त भावनांचा उद्रेक थांबवणं कठीण ठरत होतं.
पुढील घडामोडीकडे राज्याचे लक्ष :
बच्चू कडू यांच्या उपोषणामुळे आणि प्रहार संघटनेच्या वाढत्या आक्रमकतेमुळे महायुती सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. मागण्या मान्य करायच्या की जनतेचा रोष सहन करायचा, याचा निर्णय आता सरकारला घ्यावाच लागेल.



